शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सूर्यनमस्कार व योगा


आताचे युग हे संगणकाचे युग आहे. तसेच अनेक वेगवेगळया क्षेत्रातील स्पर्धेचे ही युग आहे. हया स्पर्धेला वयाचे व विषयाचे बंधन नाही. हीस्पर्धा अतिशय लहान वयापासून सुरू होते व ती कधी संपतच नाही. या स्पर्धेत जो जिंकतो तो यशस्वी होतो व जो हरतो तो अपयशी होतो. जो हया स्पर्धेत तग धरू शकतो तो आत्मविश्वास मिळवतो व स्वत:ची प्रगती करून घेतो, व जो तग धरू शकत नाही तो हरतो, आत्मविश्वासगमवून बसतो. हयातून नैराश्य निर्माण हाते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होत जातो. अभ्यासाची नावड उत्पन्न होते. सारासार विचार करण्याची प्रवत्ती नष्ट होते. हया गोष्टीतूनच विघातक गोष्टी करण्याची मुलांची प्रवत्ती होते.
जेंव्हा अडीच तीन वर्षाची मुले पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जातात. त्यावेळी आजूबाजूच्या बदलणाऱ्या अनेक गोष्टींना सामोरे जात असतात. शाळेत होणाऱ्या अनेक स्पर्धा व शालेय अभ्यासक्रम हयात आपल्या मुलाने सतत यशस्वी व्हावे अशी पालकांची तीव्र इच्छा व त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नात मुलांची होणारी शारीरिक व मानसिक ओढाताण. आजच्या गतीमान जीवनामुळे व बदलत्या राहणीमान व विचारसरणीमुळे पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष त्यामुळे मुलांचा मानसिक कोंडमारा होत असतो. खरे तर शालेय जीवनाचा काळ हा मुलांच्या सर्वांगीण (व्यक्तीमत्व) विकासाचा अतिशय महत्वाचा काळ. हया वयात ब-याच गोष्टी पालकांच्या आग्रहाखातर मुलांना मनाविरूध्द स्वीकारायला लागतात. अशावेळी त्यांच्या मनात प्रचंड वैचारिक संघर्ष चाललेला असतो. अशा काळात मुलांचा व पालकांचा संवाद साधला गेला नाही तर अशा वैचारिक संघर्षाचा ताण हा मुलांच्यात अस्थिरता निर्माण हाणे, चिडचिडेपणा वाढणे, हेकेखोरपणा वाढणे, उलट उत्तरे देणे, एकलकोंडा स्वभाव होणे, आत्मकेंद्रित होणे अशा वागण्यातून बाहेर पडतो. अशा वर्तनाचे मूळ हे घर, शाळा व आजूबाजूच्या परिस्थितीमुळे निर्माण होणऱ्या मानसिक ताणतणवात असते.
हया व अशा मानसिक ताणतणावाची तीव्रता कमी करण्यासाठी इ.स. पूर्व 500 वर्षांपूर्वी जगाचे पालकत्व स्वीकारून महामुनी पतंजलींनीनिर्मिलेल्या योगशास्त्राचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी खात्रीलायकरित्या होऊ शकतो.

            योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध होय.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टिकोनातून शारीरिक, मानसिक, बौध्दिक, भावनिक, आरोग्य हयांचे निकोप संवर्धन होणे हे महत्वाचे पैलू मानता येतील. पतंजली मुनींनी सांगितलेल्या 'अष्टांग-योगा'ची ढोबळ मानाने दोन विभागात विभागणी होते.

१. बहिरंग योग (यम, नियम, आसन, प्राणायम)
२. अंतरंग योग (प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी)
बहिरंग योगातील प्रथम चार भाग- यम, नियम, आसन, प्राणायम व अंतरंग योगातील धारणा ध्यान समाधी व हया दोहोंना जोडणारे 'प्रत्याहार' हे अंग आहे. एकूण व्यक्तिमत्त्व विकास हा योगाभ्यासाने लाभणारा तात्काळ फायदा जरी असला तरी, योगाचा दीर्घ परिणाम हा आपल्या संस्कृतीप्रमाणे तसेच योगसाधनेनुसार, मोक्षाकडेच घेऊन जाणारा असतो.
हया आठ अंगांपैकी पहिली दोन अंगे यम, नियम हयांचा मानसिक व भावनिक संवर्धन करणे व आसन, प्राणायाम यांचा शारीरिक आरोग्य, बौध्दिक संवर्धन करणे हयासाठी उपयोग होऊ शकतो.
               आजच्या ऐहिक जीवनात स्पर्धेला तोंड देण्यासाठी आसन प्राणायाम हया दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. त्यांच्या अनुशंगाने सारासार विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते व चूक-बरोबर, वाईट चांगले हयातील फरक समजून घेण्यास मदत होते. हया जोडीला यम, नियम, यांचेदेखील काटेकोर पालन झाले तर, त्यावेळेस मूल उज्ज्वल यशाकडे मार्गक्रमणा करू लागते. हया गोष्टी लिहिण्यास व बोलण्यास खूप सोप्या वाटत असल्या तरीही आचरणात आणण्यास खूप अवघड आहेत. कारण हयांचा परिणाम दिसून येण्यास खूप जास्त काळ वाट पाहावी लागते, व हे परिणाम प्राप्त होईपर्यंत आणि प्राप्त झालेले परिणाम कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी, योगाचा सराव सातत्याने करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.

                 योगासने व व्यायाम (कसरत) ह्यामध्ये बराच फरक आहे. आसनाची ग्रंथांतर्गत व्याख्या 'स्थिर सुखम् आसनम्' ह्या सूत्राप्रमाणे आसनाच्या आदर्श स्थितीमध्ये स्थिर सुखाचा अनुभव घेतल्यामुळे शक्तिसंचय करता येतो. त्याच प्रमाणे आसनस्थिती मध्ये श्वासावर नियंत्रण होऊन प्राणवायू शरीराच्या छोटया केशवाहिन्यांपर्यंत म्हणजेच अत्यंत सूक्ष्म स्तरापर्यंत कार्यरत होतो व त्यामुळे साधकार्यात एकंदर कार्यक्षमता वृध्दिंगत होते. ही कार्यक्षमतेची वृध्दिंगत अवस्था साधकास सर्व स्तरावर प्रगतीकारक ठरते. ह्याच्या सततच्या अभ्यासाने साधकाची कार्यक्षम वृत्ती वाढीस लागते व साधक कायम यशोमार्गावर वाटचाल करतो. आसनाच्या अभ्यासामुळे शरिरात निर्माण होणारी उर्जा ही बाहेरील प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यात मदत करते.

 
योगाच्या आधारे सूर्योपासना करणे हे उद्दिष्ट मानून बीजमंत्रासहित केलेला सूर्यनमस्कार हा व्यायामाबरोबरच उपासना देखिल घडवून आणतो. ह्या उपासनेतून ईश्वराला शरण जाण्याची जाणीव होते. ह्याचा पुढील आयुष्यात खूप चांगला परिणाम अनुभवास येतो. सूर्यनमस्कारामुळे शारिरीक संवर्धनास मदत होते.
सूर्यनमस्कारात योगासनांचा अभ्यास असून प्राणायमांची साधना आहे. सूर्यनमस्काराच्या मदतीने सूर्यनारायणाची उपासना होते. व त्याचबरोबर मंत्रांचे सामर्थ्य आहे. म्हणून त्याला सर्वांगसुंदर व्यायाम म्हटले अहे. ह्या सूर्यनमस्करात समाविष्ट असलेल्या सहा आसनांचा आपण अभ्यास करणार आहोत. ह्या सहा आसनाची साखळी म्हणजेच सूर्यनमस्कार होय.
सूर्यनमस्कार हा १० अवस्थामधून केला जातो. सूर्यनमस्कारात असणाऱ्या आसनांचा विचार करताना त्या अवस्थांना आसनांचेच निकष लावणे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ प्रत्येक अवस्थेत येण्यासाठी करावी लागणारी हालचाल संथ व नियंत्रित गतीनेच व्हावयास हवी.
सूर्यनमस्काराच्या सुरुवातीला हात छातीजवळ नमस्कार स्थितीत धरुन पाय जुळवून समोर पहावे किंवा डोळे मिटून बिजमंत्रासहीत सूर्याच्या नावाचा उच्चार करावा. ही सूर्यनमस्काराची दहावी अवस्था असली तरी सुरुवातही ह्याच स्थितीतून करायची असते.
सूर्यनमस्कार अवस्था १ :
या अवस्थेत सुरुवातीला जोडलेले हात सरळ डोक्यावर घेत असताना संथपणे श्वास घ्यायचा व हात वरती घेतल्यावर दृष्टी हाताच्या अंगठयाकडे स्थिर ठेवावी. ह्या अवस्थेत पाय गुडघ्यात ताठ ठेवून काही सेकंद स्थिर रहावे.
परिणाम : शरीराच्या पुढील भागास खेच बसते व जास्तीत जास्त ताण येतो. पाठीचा कणा विरुध्द बाजूस वाकवल्याने पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारुन शरीराचा तोल सांभाळण्यासाठी एकाग्रता वाढते.
सूर्यनमस्कार अवस्था २ : (आसन जानुभालासन)
ह्या अवस्थेत श्वास सोडत सावकाश पुढे वाकून हात दोन्ही पायाच्या शेजारी टेकवावेत. कपाळ गुडघ्यास लावून त्या अवस्थेत काही सेकंद स्थिर रहावे व संथ श्वसन करावे.
परिणाम : ह्या अवस्थेत शरीर उभे ठेऊन त्याची घडी घातली जाते. त्यामुळे पाय सरळ व डोके खाली ह्या अवस्थेत मेंदूला होणारा रक्तपुरवठा काही प्रमाणात वाढतो त्याचप्रमाणात शरीराची उंची कमी झाल्याने हृदयाचा ताण कमी व्हायला मदत होते. शरीराच्या मागच्या बाजूला ताण पडूण पोटाची पध्दतशीरपणे घडी झाल्याने पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढण्यास उपयोग होतो.
सूर्यनमस्कार अवस्था ३ : (अर्धभूजंगासन)
दोन्ही हात व डावा पाय जागेवरुन हलू न देता उजवा पाय मागे नेऊन गुडघा दुमडून दृष्टीवर ठेऊन स्थिर रहावे. जो पाय जागेवर राहतो त्यावर ओटीपोटीचा दाब येतो. पोटरी व मांडी एकमेकांना चिकटून ठेवून श्वसन संथ ठेवावे. काही काळ ह्या अवस्थेत स्थिर रहावे.
परिणाम : ह्या अवस्थेत पाठीच्या कण्यातील ताण भूजंगासनाप्रमाणेच असतो. फक्त दोन्ही पाय परस्परविरोधी अवस्थेत असल्याने कमरेच्या सांध्यात निरनिराळया दिशेने ताण येतात. तेथील सांध्याची कार्यक्षमता वाढते.
सूर्यनमस्कार अवस्था ४ : (हस्तपादासन)
अर्धभूजंगासनातून उजवा पाय मागे घ्या व डावा पाय गुडघ्यामध्ये वर उचला आणि गुडघ्यात सरळ करुन दोन्ही पाय जुळवून ठेवा. पायाचे चवडे टेकलेले, दोन्ही टाचा उभ्या, दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर पूर्णपणे टेकलेले, हात कोपरात ताठ अशा अवस्थेत दृष्टी स्थिर ठेवून श्वसन संथपणे चालू ठेवावे.
परिणाम : हात व मनगटे मजबूत होतात. शरीरांतर्गत अवयवांवर ताण येत नाही. व ह्या अवस्थेत फक्त गुरुत्वाकर्षणाचाच शरीरावर परिणाम होतो.
सूर्यनमस्कार अवस्था ५ : (अष्टांगासन)
हस्तपादासनातून श्वास सोडत कोपरात वाकून गुडघे, छाती, कपाळ जमिनीवर टेकवा. या अवस्थेत मांडया, कंबर व पोट वर उचलून घेणे आवश्यक असते. या अवस्थेत संथ श्वसन करावे.
परिणाम : ह्या अवस्थेत पोट वरती उचलल्याने पोटाच्या स्नायूंवर दाब पडतो. त्यामुळे यकृत, प्लीहा व अन्य अवयवांची कार्यक्षमता वाढते.
सूर्यनमस्कार अवस्था ६ : (भुजंगासन)
ह्या अवस्थेत हात कोपऱ्यात ताठ होईपर्यंत शरीराचा भाग वरती उचलावा. गुडघे व चवडे वरती टेकलेले असावेत. व मान पाठीमागच्या बाजूला सैल ठेवावी व संथ श्वसन करावे.
परिणाम : शरीराच्या वेगवेगळया भागांवर ताण येतो. ह्या अवस्थेत शरीर पूर्णपणे उलटया दिशेने वळविले जाते. त्यामुळे पोटावर ताण येऊन पाठीच्या कण्यावर सुध्दा त्याचा परिणाम होतो. व शरीराचे आरोग्य सुधारते.
सूर्यनमस्कार अवस्था ७ : (जानुशिरासन)
भूजंगासनाच्या (6व्या) अवस्थेतून कंबर वर उचलून टाचा जमिनीवर टेकवा व शरीराला मागच्या दिशेने रेटून मान आत वाकवून हनुवटी कंठात दाबून ठेवा. हात व पाय कोपरात व गुडघ्यात न वाकवता ताठ ठेवा. श्वसन संथपणे चालू ठेवा.
परिणाम : भुजंगासनात ताणले गेलेले पोटाचे स्नायू या आसनात आकूंचन पावतात. त्यावरील पोटातील स्नायू व अंतस्त्रावी ग्रंथीवर दाब येतो. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढून मानेचे मणके ताणले जातात. व पाठीचा कणा लवचिक होतो.
सूर्यनमस्कार अवस्था ८ : (अर्धभूजंगासन)
दोन्ही हात व डावा पाय जागेवरुन हलू न देता उजवा पाय मागे नेऊन गुडघा दुमडून दृष्टीवर ठेऊन स्थिर रहावे. जो पाय जागेवर राहतो त्यावर ओटीपोटीचा दाब येतो. पोटरी व मांडी एकमेकांना चिकटून ठेवून श्वसन संथ ठेवावे. काही काळ ह्या अवस्थेत स्थिर रहावे.
सूर्यनमस्कार अवस्था ९ : (आसन जानुभालासन)
ह्या अवस्थेत श्वास सोडत सावकाश पुढे वाकून हात दोन्ही पायाच्या शेजारी टेकवावेत. कपाळ गुडघ्यास लावून त्या अवस्थेत काही सेकंद स्थिर रहावे व संथ श्वसन करावे.

सूर्यनमस्कार अवस्था १० :
हात छातीजवळ नमस्कार स्थितीत धरुन पाय जुळवून समोर पहावे किंवा डोळे मिटून बिजमंत्रासहीत सूर्याच्या नावाचा उच्चार करावा.
सूर्यनमस्कार सुरु करण्याच्या आधी म्हणण्याचा मंत्र
 ॥ ॐ मित्राय नमः ॥
॥ ॐ रवये नम: ॥
॥ ॐ सूर्याय नम: ॥
॥ ॐ भानवे नम: ॥
॥ ॐ खगाय नम: ॥
॥ ॐ पूष्णे नम: ॥
॥ ॐ हिरण्यगर्भाय नम: ॥
॥ ॐ मरिचये नम: ॥
॥ ॐ आदित्याय नम: ॥
॥ ॐ सवित्रे नम: ॥
॥ ॐ अर्काय नम: ॥
॥ ॐ भास्कराय नम: ॥
सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने शारीरिक पातळीवर स्थिरता निर्माण करता येते. तसेच संबधित अवयवांवर दाब व ताण येतात. त्यामुळे त्या अवयवांमधील रक्ताभिसरण सुधारते. शुध्द रक्ताचा पुरवठा झाल्याने त्या अवयवांचे कार्य वृध्दिंगत होते. त्याच्या संबधित असलेले विकार बरे होण्यास मदत होते. उदा. पोट दुखणे, अन्नाचे पचन न होणे, भूक न लागणे या विकारांवर सूर्यनमस्काराचा सकरात्मक फायदा होतो व लहान मुलांचे आरोग्य सुधारुन प्रतिकार शक्ती वाढते. शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलन राखणाऱ्या ग्रंथीचे कार्य सुधारते व त्यांची कार्यक्षमता वाढते. तसेच स्थिर नमस्कारामुळे मुलांमध्ये स्थिरता निर्माण होऊन त्यांच्यातील चंचलता कमी होते. लहान मुलांमध्ये आढळून येंणारे सर्दी, वारंवार येणारा ताप, भूक मंदावणे ह्या सारख्या विकारांना काही प्रमाणात दूर ठेवता येते.
 - सौ. चारूता प्र. फाळके